महाराष्ट्रातील काही भागांत आज मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबई, पुण्यासह कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे.अनेक ठिकाणी पूर आला असून धरणांचे दरवाजे उघडले आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट आठ इंचावर आली आहे. 39 फुटांवर पंचगंगा नदीची इशारा पातळी आहे.कोकणातही मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. काजळी नदी 17 मीटरवर, गोदावरी नदी 7 मीटरवर, मुचकुंदी नदी चार मीटरवर तर तर जगबुडी 6.85 मीटरवर आहे. काजळी नदीचं रौद्ररूप अजूनही कायम आहे.
कोल्हापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी, जाधववाडी इथं २ फूट पाणी आलं आहे. यामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे.मुंबईतील अनेक भागांत आज सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात व रस्त्याच्या कडेला पाणी साचलं आहे. ठाण्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील धरणे भरली आहेत. वाळवा तालुक्याच्या रेठरे धरण तलावाच्या बाहेर असणारा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.विदर्भात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोलीमधून गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट उघडले आहे. त्यातून 3.21 लक्ष क्यूसेक एवढा विसर्ग सुरू आहे. नदीकिनारी गावातील नागरिकांनी विशेषतः सतर्कता इशारा दिला आहे. वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे. १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी आहे.