- १५ ते १७ डिसेंबर दरम्यान एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजन
पुणे | भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय बाराव्या भारतीय छात्र संसदेचे १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संचालक डॉ. के. गिरीसन उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.
बाराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन गुरुवारी १५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता तर, समारोप शनिवारी १७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता होणार आहे. तीन दिवस चालणार्या या छात्र संसदेत भारत सरकारच्या कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, पर्यावरणवादी, हरित कार्यकर्ता आणि हिमालयन पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती, प्रसिद्ध अभिनेत्री व राज्यसभेच्या माजी खासदार रूपा गांगुली, सीबीआयचे माजी संचालक डी. आर. कार्तिकेयन, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता व राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा, प्रख्यात पत्रकार, राजकीय भाष्यकार श्री रशीद किडवाई, राज्यसभेचे खासदार संजय सिंह, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारत सरकारचे राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, लोकसभेचे खासदार मनीष तिवारी, लल्लनटॉपचे संपादक सौरभ द्विवेदी, राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, स्तंभकार एवं लेखक विक्रम संपत, प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन, पत्रकार, लेखक परंजॉय गुहा ठाकुर्ता, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता भारती घोष यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तीन दिवस चालणार्या या बाराव्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.
जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, जस्टिस एन. संतोष हेगडे, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, डॉ. विजय भटकर हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.
छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभाखेरीज या छात्र संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली गेली आहेत.
संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे:
सत्र १ : भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे?
सत्र २ : घराणेशाही – प्रत्येक राजकीय पक्षाचे कटू सत्य?
सत्र ३ : लोकशाही आणि कॉर्पोरेटशाही- सत्ता कोणाकडे?
सत्र ४ : कमी भारतीय अधिक पाश्चत्य : भारतीय चित्रपटाचे बदलते स्वरूप
सत्र ५ : भारतीय माध्यमांवर गोंगाटाचे की कायद्याचे राज्य?
सत्र ६ : समान नागरी संहितेची वेळ आली आहे का?
याशिवाय विशेष अशा दोन ‘नेटवर्किंग’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे.
भारतीय छात्र संसदेविषयी:
तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतीकारक बदल घडवून आणणे, राष्ट्र व समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे, या हेतूने २०११ मध्ये भारतीय छात्र संसदेचा प्रारंभ झाला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक प्रा. राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संकल्पक व समन्वयक आहेत. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे या छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत. छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम असून, त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या बाराव्या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्टये:
- २९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग. महाविद्यालयांच्या पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी होऊन त्यापैकी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना या छात्र संसदेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाते.
- २०० विद्यापीठातील ९० हजार विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग.
- भारतातील ६ राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग.
- भारतातील ६ राज्यातील संसदीय कार्यमंत्र्यांचा सहभाग.
- भारतातील ६ विविध विद्यापीठातील कुलगुरूंचा सहभाग
- निरनिराळ्या राज्यातील आणि विविध पक्षातील तरुण आमदारांचा सत्कार.
- आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार व आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे.
- आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान व आदर्श युवा आध्यात्मिक गुरू सन्मान सुध्दा देण्यात येणार आहेत.
सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.