हिंसाचार आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यांवरून केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घातली आहे. या बंदीचे स्वागत करताना विरोधकांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी संघावर बंदीची मागणी केली आहे. तर, लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद के. सुरेश यांनीदेखील पीएफआय आणि संघ एकसारखेच असून संघावर बंदीची मागणी केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली आहे. पीएफआयकडून देशाच्या संविधानावर अविश्वास व्यक्त करण्यात येत असून त्यांना 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितला. देशातील विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारातही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले. छुप्या अजेंड्यानुसार समाजातील एका वर्गाला कट्टरतावादाकडे वळवून लोकशाहीला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करत होते. देशाच्या संविधानाबद्दल या संघटनेचा अनादर दिसत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले की, पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे. संघावर आधीदेखील बंदी घालण्यात आली होती. पीएफआय, संघासारख्या इतर संघटनांवर कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले. हिंदू-मुस्लिम करून दुफळी माजवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हिंदू-मुस्लिम करून तणाव करणे, मशिदींवर भगवा झेंडा लावणे या चुकीच्या गोष्टी आहेत. देशात सांप्रदायिकता वाढवून दंगल घडवणे आणि सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले.
काँग्रेसचे लोकसभेतील प्रतोद के. सुरेश यांनीदेखील संघावर बंदी घालण्याची मागणी केली. पीएफआय आणि संघ या दोन्ही संघटना सारख्याच असल्याचे त्यांनी सांगितले. संघदेखील देशभरात जातीयवाद पसरवत आहे. पीएफआय प्रमाणे संघावरही बंदी घातली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.