पुणे | तीन महिन्यात दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील चौघांनी सव्वा तीन कोटींची फसवणूक केल्याची तक्रार सांगलीतील विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रक्कम गुंतवल्यानंतर तीन महिन्यात दीडपट परतावा आणि अलिशान मोटार देण्याचे आमिष दाखवून ३ काेटी २८ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी ऋषीकेश अशाेक बारटक्के (रा.बाणेर, मायाेला रेसीडेंसी, पुणे) याच्यासह पुण्यातील तिघांविरूध्द विटा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन सुभाष शहा (सदाशिव पेठ, पुणे), आदित्य दाडे (मुकुंदनगर, स्वारगेट, पुणे) व श्रीमती निलमणी धैर्यशील देसाई (बाणेर राेड, पुणे) अशी या गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी माहुली येथील आबासाहेब दत्ताजीराव देशमुख यांनी विटा पाेलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
आबासाहेब देशमुख यांनी विटा पाेलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१५ मध्ये डाॅ. सुशांक शहा बॅडेट्रीक रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा नितीन शहा यांच्याशी ओळख झाली हाेती. त्यानंतर नितीन यांचे मित्र ऋषीकेश बारटक्के हे संर्कित आले. बारटक्के हा पुणे येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत असून त्यांनी सध्या निलमणी धैर्यशील देसाई यांच्या मालकीचे पर्वती येथे ४९ गुंठे जागा कुलमुखत्यारपत्राव्दारे सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण करून ताे विक्री करण्यासाठी घेतलेली असल्याचे सांगितल. निलमणी देसाई यांच्याकडून ऋषीकेश बारटक्के यांचे नावे घेतलेले कुलमुखत्यारपत्र दाखविले. या जागेमध्ये असलेल्या महसुलच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व जागेमध्ये इतर कामे करण्यासाठी अंदाजे ४ काेटी रूपयांची आवश्यकता असून या जागेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास ३ महिन्यामध्ये दीडपट माेबदला आणि नवीन चारचाकी अलिशान वाहन देताे, असे आमिष दाखवले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.