मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. त्यातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. ”राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जे विश्वासघातानं आलं होतं. ते सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे,” असे पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ”राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जे विश्वासघातानं आलं होतं. ते सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. ज्या हिंदुत्वावर शिवसेना उभी होती ती शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेलेली आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक निर्णय झाले. अनेक वर्षापासून अफजल खानाच्या कबरीशेजारील अतिक्रमण काढण्याचं धाडस उद्धव ठाकरेंमध्ये नव्हते. परंतु आमचं सरकार आल्यानंतर ते अतिक्रमण काढून टाकलं”.
दरम्यान, पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ”जयंत पाटील हा राज्यातील बिनडोक नेता आहे. माझ्या भावाला तुम्ही हद्दपारीची नोटीस दिली होती. आमच्यावर अनेक गुन्हे नोंद केले. त्यावेळी तुम्ही काय केले?”, असा सवालही यावेळी उपस्थित केला.