नवी दिल्ली | भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. लळीत यांच्या नियुक्तीनंतर एक आश्चर्यचकित करणारा प्रकार घडला आहे. भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांनी त्यांचे वडील, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उमेश रंगनाथ ललित यांच्यासाक्षीने कोर्टात पहिल्या दिवसाची सुरुवात केली.
उमेश रंगनाथ लळीत यांचे वय वर्ष ९० आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांनी सरन्यायाधीश कामकाजाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या वडिलांनीही कोर्टात हजेरी लावली. सर्वोच्च न्यायालयातील इतर वकिलांप्रमाणे ते देखील आपल्या मुलाला सरन्यायाधीश म्हणून काम करताना पाहत होते. जवळपास २० मिनिटे ते कोर्टाचे कामकाज पाहत कोर्टरुममध्ये उभे होते. त्यानंतर सरन्यायाधीक्ष उदय लळीत यांना अभिवादन करुन ते कोर्टाच्या बाहेर पडले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम न करणारे उदय लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. उदय लळीत यांच्या कुटुंबात तब्बल १०२ वर्षांचा वकिलीचा वारसा आहे. लळीत यांचे आजोबा, चार काका व वडिलही वकीली करायचे. त्यांचे वडील उमेश रंगनाथ लळीत हे महाराष्ट्रातील नामवंत वकील होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून उदय लळीतही कायदे क्षेत्रात उतरले आहेत.
ज्येष्ठ वकील उमेश आर लळित न्यायालयात उभे असल्याचे पाहून काही ज्येष्ठ वकिलांनी त्यांना बसण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला. आपला मुलगा सरन्यायाधीशा पदी विराजमान होत असतानाचा एक क्षणही त्यांना चुकवायचा नव्हता. कोर्टाच्या पुढच्याच रांगेच्या कोपऱ्यात उभं राहून ते कामकाज पाहत होते. उमेश आर लळित हे जेष्ठ वकिल असल्याने ते कोर्टरुममध्ये वकिलांच्या पोशाखात होते. साधारण २० मिनिटे कामकाज पाहिल्यानंतर ते कोर्टरुमच्या बाहेर पडले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे न्या.लळीत यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. त्यांचे वडील न्या.उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. न्या.उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. न्या.लळीत हे २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत