मुंबई | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Election) भाजपने माघार घेतल्याने मुरजी पटेल (Murji Patel) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आभार मानले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विधानसभेवर बिनविरोध जाणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘प्रिय मित्र देवेंद्रजी, जय महाराष्ट्र… काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात, ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.
दरम्यान, राज ठाकरे यांनी रविवारी पत्र लिहित भाजपने निवडणूक लढवू नये, अशी विनंती करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर भाजपनेही या पत्राचा गंभीर विचार करत अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पत्र लिहिले असून, यात आभार मानले आहे.