मुंबई | राज्यपाल आणि मंत्री या सगळ्यांमध्ये शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये मंगल प्रभात लोढा यांची भर पडली आहे. ही स्पर्धा तुम्ही करत असाल तर महाराष्ट्राची आणि देशाची जनता डोळे बंद करून बसली नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे (उ.बा.ठा.) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले. तसेच शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना करारा जवाब मिलेगा, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल असो किंवा सत्ताधारी मंत्री यांच्याकडून विविध विधाने करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘मंगलप्रभात लोढा महाराष्ट्राचे मंत्री, पर्यटन मंत्री आहेत. निदान त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असायला हवा. पर्यटक शिवाजी महाराजांनी केलेले गडकिल्ले पाहायला येतात. त्यावेळी छत्रपतींच्या आग्रा दौऱ्याची तुलना एका पक्षाशी, राज्याशी गद्दारी करणाऱ्यांसोबत करत आहात. याचा अर्थ तुम्ही छत्रपतींनाच बेईमान ठरवण्याचा प्रयत्न करत आहात.
तसेच शिवराय आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याची स्पर्धा तुम्ही करत असाल तर महाराष्ट्राची आणि देशाची जनता डोळे बंद करून बसली नाही. सगळं काही पाहत आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना करारा जवाब मिलेगा, असेही म्हटले आहे.