बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन वर्षात बळीराजा सुखी व्हावा हीच प्रार्थना असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ५६ ते ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. जर नव्या वर्षात चांगला पाऊस झाला तर हे वर्ष चांगले जायला हरकत नाही. असे शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
बळीराजा यशस्वी झाला तर, इतर घटकांचे दिवस देखील चांगले येतात. त्यासाठी व्यापार-उद्योगातही चांगले दिवस आले पाहिजे. भारत देश हा महत्वाचा निर्यातदार देश होऊ शकतो. त्याकरीता आधी उद्योग आणि व्यापारामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. सत्ता कोणाचीही असो, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वांना राजकीय मतभेत सोडून एकत्र यावं लागेल. अर्थव्यवस्था नीट करावी लागेल असेदेखील पवार म्हटले. देशाचे अर्थकारण सुधारण्यासाठी काळजी घ्यावी लागेल हेच येणाऱ्या वर्षात आव्हान असून आपण सर्वजण सामोरं जाऊया असंदेखील शरद पवार म्हटले आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाविषयी बोलताना, विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही. सभागृहात गोंधळ करायचा. या गोंधळात हव्या त्या गोष्टी मंजूर करुन घ्यायच्या अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. हे चित्र यापूर्वी कधी पाहायला मिळाले नाही. हे किती दिवस चालणार याचा विचार आम्हा विरोधकांना बसून करावा लागेल असेही शरद पवार म्हणाले. त्यासाठी जानेवारीच्या शेवटी सर्व विरोधी पक्ष आम्ही एकत्र बसणार असल्याचंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.