देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदान पार पडतंय…काँग्रेसनं यावेळी इंडिया आघाडीचा प्रयोग करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसनं यंदा मात्र त्यांच्या लढाईचा पॅटर्न बदलला आहे. हा पॅटर्न नेमका काय आहे? याच संदर्भात सदर व्हिडीओतून जाणून घेऊ…
काँग्रेस पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसनं यावेळी 330 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यातील दोन उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं त्यांची संख्या 328 वर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने मित्र पक्षांसाठी 101 जागा सोडल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 421 जागांवर उमेदवार दिले होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेस कमी जागांवर निवडणूक लढत असली तरी कर्नाटक, ओडिशा आणि मिझोरम या राज्यांमध्ये 2019 च्या तुलनेत अधिक जागांवर निवडणूक लढवतेय. कर्नाटकमध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसनं 21 लोकसभा मतदारसंघातील जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेस सर्व जागांवर म्हणजेच 28 लोकसभा मतदारसंघातील जागांवर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे ओडिशामध्ये देखील काँग्रेस सर्वच्या सर्व म्हणजे एकूण 20 जागांवर यंदाची लोकसभा निवडणूक लढवत आहे.
काँग्रेसने कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा सोडल्या?
2019 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीचा विचार केल्यास सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये सोडल्या आहेत. मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं 67 जागा लढवल्या होत्या. यावेळी काँग्रेस तिथं 17 जागांवर लढत आहे म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं 50 जागा यावेळी कमी लढवल्या आहेत.
उत्तर प्रदेशचा विचार केला तर, इथं भाजपचे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत…भाजपचं या राज्यावर वर्चस्व आहे. त्यामुळेच कॉंग्रेस याठिकाणी कमी जागा लढवत आहेत अशी शक्यता आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं गेल्या लोकसभा निवडणुकीत 40 जागा लढवल्या होत्या यावेळी तिथं ते 14 जागा लढवत आहेत म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस यावेळी 26 जागा कमी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत…काँग्रेसने इंडिया आघाडीत पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केलीय…तर महाराष्ट्रात 2019 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती…त्यावेळी काँग्रेसनं 25 जागा लढवल्या होत्या. आता महाविकास आघाडीत काँग्रेस एकूण 17 जागा लढवत आहे…महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्यामुळे इथं महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षाचं ज्या लोकसभा मतदार संघात अधिक वर्चस्व आहे तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराला उभा केलं जातंय. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत कॉंग्रेसने आघाडी केलीय…महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा या फार्म्युलावर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसची दिल्ली आणि हरियाणात आम आदमी पार्टी सोबत आघाडी झाली आहे याशिवाय देशभरात इंडिया आघाडीतील इतर राजकीय पक्षांना देखील काँग्रेसनं जागा सोडल्या. या निवडणुकीतला कॉंग्रेसच्या लढाईचा नवा पॅटर्न कितपत यशस्वी होतो हे इथल्या निकालावरूनच स्पष्ट होईल