नाशिक | यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता निघालेल्या बसचा औरंगाबाद रस्त्यावर पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. यापैकी १३ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला. डंपरचालक फरार आहे. अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे.
अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. बसमध्ये २० ते २५ प्रवासी असल्याचा अंदाज आहे. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदेंनी मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर केली ५ लाखांची मदत
या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान डोईफोडे यांनी दिली.
याशिवाय बसला आग लागल्याने अनेकजण गंभीररित्या भाजल्याने , त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, मदतकार्य सुरू आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचाराचे आदेश देखील देण्यात आले आहे.