पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास बड्या बिल्डरच्या अल्पवयीन पुत्राने आपल्या आलिशान पोर्शे कारने बाईकवरील दोघांना चिरडलं. या भीषण अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन आयटी इंजिनिअर्सचा जागीच जीव गेला. या घटनेनंतर जमावाने आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं. त्याला पोलिस ठाण्यात पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. या प्रकरणाची वरिष्ठांना माहिती न दिल्याने दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून त्यांचे निलंबन करण्यात आले.या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते.या प्रकरणामुळे पुणे पोलिसांवर चौफेर टीका केली जात आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही आरोप सातत्याने केला जातोय. असं असताना राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात १४ पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील ४९ पब आणि बार वर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले असून ते बंद करून सील करण्यात आले आहे.याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली. चरणसिंग राजपूत यांनी माहिती दिली की, कल्याणीनगर येथील अपघातानंतर जवळपास ४९ पब आणि बार वर कारवाई करण्यात आली आहे.या घटनेच्या पूर्वी देखील एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ५७ पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षभरात २५७ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.तसेच या कारवाई मध्ये १ कोटी १२ लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला असल्याचं चरणसिंग राजपूत म्हणाले.त्यामुळे इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहेत.