लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात मतदान पार पडतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवारांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यावर केलाय. रोहित पवारांनी यासंदर्भात दोन ट्विट करत सुजय विखेंवर निशाणा साधलाय. तर या प्रकरणावर कारवाई करावी असं आवाहनही पोलीस प्रशासनाला यावेळी रोहित पवारांनी केलंय.
अहमदननगर लोकसभा मतदारसंघातील पारनेरमध्ये रात्रीच्या वेळी पैशांनी भरलेली बॅग घेऊन जात असलेल्या काही लोकांना नागरिकांनी पकडलं. यावेळी बॅगेतून पैसे रस्त्यावर पडल्याचा एक व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विट केला. “‘उत्तरे’तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात ‘नगर दक्षिणे’त पैशांची धुवांधार बरसात… अपेक्षा आहे की, या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील!” असं म्हणत रोहित पवारांनी पैशांनी भरलेल्या बॅगांचा व्हिडीओ ट्विट करत सुजय विखेंवर निशाणा साधला.
तर, 13 मे रोजी मतदान सुरू झाल्यानंतर रोहित पवारांनी आणखी एक ट्विट करत सुजय विखेंवर थेट आरोप केला. डॉ. सुजय विखे यांच्या नावाने मतदारांना एक पाकिट पोहोचवण्यात आल्याचा आरोप यावेळी रोहित पवारांनी केला. या पाकिटातून मतदारांपर्यंत पैसे पोहोचवत सुजय विखेंना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आल्याचंही रोहित पवारांनी ट्विट करत स्पष्ट केलंय. “नगर दक्षिण मतदारसंघात आज ‘राजा’ असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा ‘प्रसाद’ आणि ‘मालक’मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे. गम्मत म्हणजे अनेक गावांमध्ये स्वाभिमानी नागरिकांनी हा प्रसाद घ्यायलाच नकार दिला तर काही गावांत ‘यंत्रणे’ने दिलेल्या प्रसादापैकी अर्धा प्रसाद गावातल्या वाढप्यानेच खाऊन टाकला… आता ‘प्रसादात’ही आडवा हात मारला जात असेल तर आजचा ‘राजा’ कसा उदार होणार?” असं म्हणत रोहित पवारांनी सुजय विखे आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. त्यामुळं आता रोहित पवारांच्या ट्विटनंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काय परिणाम दिसणार हे पहावं लागणार आहे.