इंदूर | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी गाठीभेटी दिल्या. पण आता त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या धमकीनंतर पोलिस हाय अलर्टवर आहेत.
राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ यात्रेमुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ असे म्हटले आहे. या धमकीनंतर पोलिस आणि गुन्हे शाखेकडून हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, पोलिस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून धमकीचं पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात असून, 24 नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच त्यांना धमकी मिळाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.