सिक्कीम | सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये १६ जवान शहीद तर ४ जवान जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती भारतीय लष्कराने एका निवेदनामार्फत दिली आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्यातील एक होते. जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर वाहन घसरले आणि खोल दरीत कोसळले. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आणि चार जखमी जवानांना विमानाने उपचारासाठी हलवण्यात आले.
या अपघातात दुर्दैवाने तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ जवान शहीद झाल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकूल कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे, असंही लष्करानं म्हटलं आहे. उत्तर सिक्कीम हा अतिशय धोकादायक भाग आहे. हा भाग सध्या पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना बलिदानामुळं खूप दुःख झाले आहे. देश त्यांच्या सेवा आणि कर्तव्याबद्दल त्यांच्याप्रति कृतज्ञ आहे. जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करतो आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
![](https://forthepeople.news/wp-content/uploads/2022/12/Capture.png)