मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी आग्रही मागणी केली आहे आणि हिंदुहृदयसम्राटांविषयी खरंच तुम्हाला इतकं प्रेम वाटत असेल तर बाळासाहेबांनाही भारतरत्न मिळावा, असं विधान केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. यानिमित्तानं संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिंना अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या विचारांची मशाल निष्ठावंतांच्या हातात आहे आणि त्यांचे विचार कुणीही असे हिरावून घेऊ शकत नाही, असं देखील राऊत म्हणाले.
बाळासाहेबांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचं बळ दिलं. कारण ते स्वत: हिमालयापेक्षा मोठे नेते होते. देशात दुसरे बाळासाहेब निर्माण होणार नाहीत. त्यांनी आपल्या परखड विचारांनी आणि भूमिकांनी राज्यासह देशाला दिशा दिली. आता बाळासाहेबांच्या नावानं जे तोतये निर्माण होणार आहेत ते भंपक असून फारकाळ टिकणार नाही. सत्तेत असलेल्यांनी वीर सावरकरांबाबतचं ढोंगी प्रेम दाखवू नये. खरंच हिंदुहृदयसम्राटांविषयी प्रेम वाटत असेल तर वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न का जाहीर झालेला नाही. त्यांच्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न मिळायला हवा. खरंतर पुरस्काराने काही या व्यक्ती मोठ्या होणार नाहीत. उलट पदव्या मोठ्या होतील असे हे नेते आहेत असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात जे काही चालू आहे ते पाहता आज जर बाळासाहेब असते तर अशाप्रकारचे कमरेखालचे घाव झालेले त्यांनी कधीच सहन केले नसते आणि अशा लोकांची अवस्था फार वाईट करुन सोडली असती असं संजय राऊत म्हणाले. पक्षाशी गद्दारी केलेले लोक फार काळ राज्याच्या राजकारणात टिकणार नाहीत. सगळे उघडे पडतील असा टोला राऊतांनी लगावला आहे.