बीड | गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी चर्चा रंगली होती. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज बीडच्या परळीत गोपीनाथ गड येथे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुंडे यांनी भाजपमध्ये राहणार की नाही, याबद्दल थेटपणे भाष्य केलं आहे.
सभेदरम्यान पंकजा यांचं भाषण सुरु असताना एक कार्यकर्ता उठला आणि पक्ष स्थापन करा, अशी मागणी करु लागला. यानंतर पंकजा मुंडे यांनी मला निर्णय घेण्यासाठी आडपडद्याची गरज नसल्याचं सांगून मी माझ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांना विचारणार आहे की, माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे, याची स्पष्टता आल्याशिवाय मला पुढे लोकांना विश्वास बांधून देता येणार नाही. त्यानंतर काय होईल ते असंच मंचावर सांगेन असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे आता निर्णायक भूमिकेवर पोहोचल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावेळी मुंडे यांनी भाजपमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्याऐवढा मोठा नेता नसल्याचंही सांगितलं आहे त्यामुळे पुन्हा चर्चेला तोंड फुटेल का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.