नवी दिल्ली | भारतात नुकतीच सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक सेवा म्हणजेच 5G लॉन्च झाली आहे. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन मधल्या जॉन्स पॉपकिन्स स्कूल ऑफ ॲडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांशी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ही सेवा संपूर्ण स्वदेशी असून ज्या देशांना ती हवी असेल त्यांना आपण पुरवू शकतो, असं विधान केले आहे.
भारतानं लॉन्च केलेल्या 5G तंत्रज्ञानासाठी काही भाग दक्षिण कोरियातून मागवण्यात आले आहेत, परंतू हे तंत्रज्ञान पूर्णतः स्वदेशी आहे. टेलिकॉम क्षेत्रात क्रांती करणारं हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे असे देखील सीतारामण म्हणाल्या.
२०२४ पर्यंत 5G देशभरात लागू
भारतात 5G तंत्रज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात आले होतं. सुरुवातीला देशातील काही निवडक मेट्रो शहरांमध्येच ही सेवा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर सन २०२४ पर्यंत ही सेवा संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. आपल्या देशात लॉन्च झालेलं हे तंत्रज्ञान इतर देशांतून आयात केलेलं नाही ते संपूर्ण स्वदेशी आहे. त्यामुळं भारतीयांना या कामगिरीसाठी अभिमान वाटला पाहिजे, असंही यावेळी सीतारामण यांनी म्हटलं आहे.