मुंबई | सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे. त्यामध्ये आता आणखी भर पडली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. हे दर मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात ३.५ रूपये प्रति किलोनं तर पीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात झाली आहे.
महानगर गॅस लिमिटेडनं शुक्रवारी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. वाढत्या खर्चाचं कारण देत एमजीएलनं ही वाढ केली आहे. याशिवाय कमी पुरवठा देखील दरवाढीचं मोठं कारण आहे.
सीएनजीमध्ये झालेल्या ३.५ रूपयांच्या वाढीनंतर हे दर ८९.५० रूपयांवर पोहोचले आहेत. यासोबतच १.५ रूपयांच्या वाढीनंतर पीएनजीचे दर वाढून ५४ रूपये प्रति एससीएमवर गेले आहेत.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात दरवाढ करत महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईकरांना झटका दिला होता. गेल्या महिन्यात सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलोनं वाढ करण्यात आली होती. तर पीएनजीच्या दरात ४ रूपये प्रति एससीएमनं वाढ केली होती. यानंतर सीएनजीचे दर ८६ रूपये प्रति किलो, तर पीएनजीचे दर ५२.५० रूपये प्रति एससीएमवर पोहोचले होते.
त्याचबरोबर एप्रिल महिन्यात सीएनजीचे दर ६० रुपये प्रति किलो होते. परंतु त्यात आता ३० रूपयांची वाढ होऊन ते ८९.५० रूपयांवर पोहोचले आहेत. तर पीएनजीच्या किंमतीत ३६ रूपये प्रति एससीएमची वाढ झाली असून ते आता ५४ रूपये एससीएमवर पोहोचलेत. एपीएमनं गॅसच्या पुरवठ्यात १० टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक खर्च करून बाहेरून इंधन मागवावं लागत असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ह्या वाढत्या दराने सर्सामान्यांना महागाईची आणखी झळ सोसावी लागत आहे.