नवी दिल्ली | शिवसेना नक्की कोणाची? असा वाद गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळतोय. राज्यात सुरु असलेल्या या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील आठ पैकी एका मुद्यावर आज निर्णय होण्याचा अंदाज आहे.
ठाकरे गटाने केलेल्या मागणीनुसार, सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठ यासंदर्भात निर्णय देणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी शिवसेनेतील ठाकरे गटाने केली आहे. त्यात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत मुख्य मुद्दा आहे.
मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे, हे सर्व लेखी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच यासंदर्भातील सर्व याचिकादारांनी एकमेकांना त्या मुद्यांची टिप्पनी लेखी स्वरुपात देण्याचे न्यायालयाने म्हटले होते. विधानसभेचे पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडून भरत गोगावले तर उद्धव ठाकरे गटातर्फे शिवसेना नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी वेगवेगळ्या याचिका सादर केल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने सात सदस्यीय घटनापीठापुढे यासंदर्भात सर्व याचिका सोपवल्यास सत्तासंघर्षांबाबतची सुनावणी लांबणीवर पडण्याची देखील शक्यता आहे.