सध्या राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या काळात काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रात आत्तापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं 5 हजार 91 जनावरंही दगावली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची चिन्हे नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यात सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेती पिकांसह जमिनीचं देखील नुकसान झालं होते. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या होत्या. तसेच रस्त्यांची अवस्था देखील दयनिय झाली आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात रविवारपर्यंत (23 ऑक्टोबर) तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्यातील मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. याचा शेती पिकांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.