मुंबई : कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यावर माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘कन्नड रक्षक वेदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली. ही घटना अत्यंत गंभीर असून, आम्ही याची तक्रार पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडे करणार आहोत, असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमाप्रश्नावरून वादंग निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळी आक्रमक झाली आहे. त्यातच बेळगावात महाराष्ट्रातील वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर वादाची ठणगी पडली. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, ‘ही गोष्ट अत्यंत गंभीर असून, राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. आमचं आम्हाला मिळेल, तुमचं तुम्हाला मिळेल. पण जर असं हातघाईवर आले तर दोन्हीकडून प्रतिक्रिया मिळतील. पण हे योग्य नाही. आम्ही केंद्राकडे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहोत’.
दरम्यान, महाराष्ट्रातील वाहनावर दगडफेक झाल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी असे प्रकार खपवून घेणार नसल्याचे म्हणत कर्नाटक सरकारला 24 तासांचा अल्टिमेटमही दिला आहे.