मुंबई | वंचित बहुजन आघाडी सन्मानजनक जागा न मिळाल्याच्या कारणास्तव महाविकास आघाडीतून अखेर बाहेर पडली. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या आठ उमेदवारांची घोषणा देखील केली परंतु, या दोघांमधलं जागावाटपावरून सुरु झालेलं पुराण मात्र काही केल्या संपताना दिसत नाही. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. नेमकं काय घडलंय ते जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा.
राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता त्यात वंचितला सोबत घ्यायचं यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार आग्रही होते मात्र वंचितच्या जागेच्या डिमांडवरून चर्चा फिसकटत होती. आणि शेवटी तेच झालं. वंचितनं महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र उमेदवारांची घोषणा करून टाकली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वंचितला पाच जागांचा प्रस्ताव दिला होता असं म्हटलं त्यावरून प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगलाय.
मुंबईतल्या हॉटेल फोर सिझनमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा आणि वंचित आघाडीला 3 जागा मिळू शकतात अशी चर्चा सुरु झाली.या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरही हजर होते. मात्र सर्व जागांवर सकारात्मक चर्चा झाली असं सांगून मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी राऊतांनी दिली. दुसरीकडे आधी बैठकीला जाणार नाही असं सांगून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले आणि तासभरातच आंबेडकर बैठकीतून बाहेरही पडले. आंबेडकरांनी बैठकीतून बाहेर येताच अजून काही ठरलेलं नाही हेही सांगितलं होतं म्हणजेच वंचितच्या दृष्टिनं ही बैठक सकारात्मक झाली नव्हती. महाविकास आघाडीच्या बैठका होऊनही काही तोडगा निघत नव्हता त्यानंतर आंबेडकरांनी एकला चलो रेची भूमिका घेत महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे महाविकास आघाडीतल्या जागावाटपाची चर्चा कशी पुढं सरकली.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपल्या ८ उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत तर कॉंग्रेसच्या २ उमेदवारांना पाठींबा दिलाय. आता वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोट बोलत असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे तर राउतांनी मविआने वंचितला शेवटी पाच जागांचा प्रस्ताव दिला होता असं म्हटलं पण ते खोटं आहे असं म्हणत महाविकास आघाडीतील जागावाटपासंबंधीच्या चर्चेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. त्यांनी सोशल मिडियावर संजय, कितना झूठ बोलोगे? अशा आशयाची एक पोस्ट देखील शेअर केली होती. वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार परिषद घेत आम्हाला महाविकास आघाडीतून केवळ ३ जागांचा प्रस्ताव मिळाला होता. संजय खोट बोलतायत. महाविकास आघाडी वेगळी आणि संजय राऊत हे वेगळे आहेत असं देखील आंबेडकरांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीत संजय राऊत हेच खडा टाकत असल्याचंही आंबेडकर म्हणाले आहे. त्यामुळे नेमकं कोण खरं बोलतंय कोण खोटं हे काहीच कळायला मार्ग नाही.