अहमदनगर | कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले होते. त्यानंतर आता चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. त्यात आता महसूलमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही अहमदनगर जिल्ह्यात तातडीने कोरोना प्रोटोकॉल लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार, सरकारने काही निर्देशही दिले आहेत. त्यात आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, ”कोरोना संदर्भात मी जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. पूर्वी आपण कोरोनाचा प्रोटोकॉल राबवत होतो, तोच प्रोटोकॉल तातडीने लागू करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. तशी जिल्ह्यात पॅनिक व्हावे अशी स्थिती नाही. मात्र, आपण उद्या मग ते वाढल्यानंतर नियंत्रण करायला जातो. तसे होऊ नये म्हणून आपण जुनाच प्रोटोकॉल तत्काळ लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत”.
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची सरकारची तयारी
पुरेशा ऑक्सिजनची उपलब्धता ठेवणे, आयसीयूची संख्या वाढवणे, बेडची संख्या वाढवणे अशा गोष्टींचा समावेश आहे. हा प्रोटोकॉल पुढील 5 ते 7 दिवसात कार्यान्वित करून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची सरकारची तयारी आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहेत, असे ते म्हणाले.