कोकणमधील पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीकडून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली होती मात्र आता काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे त्यामुळे आघाडीत बिघाडीचे संकेत दिसू लागले आहेत.
भाजपचे निरंजन डावखरे यांचा कार्यकाळ संपल्याने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सलग दोनवेळा म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर दुसऱ्यांदा भाजपकडून निरंजन डावखरे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या निवडणूकीपासून या मतदारसंघात बांधणी सुरू केली होती. भाजपशी फारकत घेऊन ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनी गेल्या वेळी निवडणूकही लढवली होती शिवाय त्यांना चांगली मतं देखील मिळाली होती. त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेने आपला उमेदवार निवडणूकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता या मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी अशी मागणी समोर आली आहे.
रायगडमधून काँग्रेसचे प्रदेश सचिव अँड प्रविण ठाकूर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली असल्याने कॉंग्रेसचे रमेश कीर हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पक्षाने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पक्ष समन्वयकाची नियुक्तीही केली असल्याची माहिती आहे.
रायगड आणि रत्नागिरी सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. महाविकास आघाडीकडून या दोन्ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आल्या होत्या. या बदल्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरचा दावा शिवसेनेने सोडावा आणि हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
काँग्रेसने लोकसभा निवडणूकीत कोकणातील सर्व प्रमुख जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्या होत्या आता त्याबदल्यात ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली आहे.
तर काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रविण ठाकूर यांनीही कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. याशिवाय पक्षाने उमेदवारी दिल्यास मी ही निवडणूक लढविणार आहे असंही त्यांनी म्हंटल आहे.