मुंबई | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यात काही मंत्र्यांना नवीन खाती देण्यात येणार आहेत तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पालकमंत्रीपदांचीही अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्या महामंडळावर अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आली नाही त्यावरही नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात प्राथमिक चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक राजकारण आणि जातीय समीकरणावर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशीही चर्चा आहे. सध्याची स्थिती पाहिली, तर अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन खाती आहेत त्यामध्ये बदल होऊन विधानसभेच्या संख्याबळानुसार त्याचे वाटप केले जाणार असंही बोललं जातंय.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवडही अजून झाली नाही तर त्यावरही लवकरच निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असे नेते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांची वर्णी महामंडळावर करण्यात येणार आहे असंही बोललं जातंय.
सिडको, महात्मा फुले महामंडळ, आण्णाभाऊ साठे महामंडळ, म्हाडा, अपंग कल्याण, चर्मोद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगीकरण विकास महामंडळ, महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि महिला अर्थिक विकास महामंडळाच्या जागा रिक्त आहेत.
महाराष्ट्रात जेव्हा शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी नऊ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. नंतरच्या काळात अजित पवारांची राष्ट्रवादीही सत्तेत आल्याने त्यांनाही नऊ मंत्रिपदं देण्यात आली. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुक असलेल्या आमदारांचे मात्र मंत्रिपदाचे स्वप्नचं राहिले.
त्यात शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यासह अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच आहेत. भरत गोगावले यांनी त्यांची संधी हुकल्याने उघड नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना संधी मिळणार का ते पाहावं लागेल.